वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरून निशाणा

महाराष्ट्र

मुंबई: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांसह कुंभमेळ्याच्या खर्चावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

जातनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारच्या जनगणना प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसेल, तर ही जनगणना अपुरी ठरेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. केवळ जात विचारल्याने ओबीसींची अचूक संख्या आणि त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक वास्तव समोर येणार नाही. त्यामुळे ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट होईपर्यंत सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

देशातील जाती-पोटजातींची विविधता लक्षात घेता केवळ जात नोंदवणे पुरेसे नसल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. विविध राज्यांमध्ये एकाच समाजाची नोंद वेगवेगळ्या प्रवर्गात होऊ शकते. त्यामुळे ओबीसींची स्वतंत्र नोंद झाल्याशिवाय जातनिहाय जनगणनेचा अपेक्षित उद्देश साध्य होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्र सरकार ओबीसींच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी उपसमितीच्या गेल्या काही महिन्यांत केवळ दोन बैठका झाल्या असून, नियमित बैठका घेण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. सरकार ओबीसी नेत्यांच्या सूचना ऐकून घेण्यास आणि प्रश्न सोडवण्यास इच्छुक नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला ओबीसीविरोधी ठरवले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या प्रश्नावरही सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे जागा बळकावल्या जात असून, या संदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मनोहर भिडेंवरही वडेट्टीवारांची टीका

मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांवरूनही वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “मनोहर भिडेंना कोण विचारतं?” असा सवाल करत त्यांनी भिडे यांच्या कथित अवैज्ञानिक वक्तव्यांवर टीका केली. आंबे खाल्ल्याने मुलं होतात, अशा अवैज्ञानिक कल्पना समाजाच्या माथी मारल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.राष्ट्रध्वजाच्या रंगांवर प्रश्न उपस्थित करून देशाच्या विभाजनाची भूमिका मांडली जात असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

‘कुंभमेळा श्रद्धेची नव्हे, सरकारसाठी भ्रष्टाचाराची डुबकी’

कुंभमेळ्याच्या खर्चावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारला घेरले. हजारो कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च केले जात असताना महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे, अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि वर्गखोल्यांची कमतरता आहे, तर तरुण रोजगाराची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च कशासाठी केला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुंभमेळ्याबाबत सरकारने पुस्तिका प्रसिद्ध केल्याचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी या पुस्तिकेत केवळ सरकारचे कौतुक करण्याऐवजी खर्च, भ्रष्टाचाराचे आरोप, कंत्राटांचे वाटप आणि सरकारी निधीच्या वापराबाबतची माहितीही द्यावी, अशी मागणी केली.“कुंभमेळा भाविकांसाठी श्रद्धेची, तर सरकारसाठी भ्रष्टाचाराची डुबकी मारण्यासाठी आहे,” अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत