मुंबई: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी (दि.१८) एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पीएम किसान योजनेच्या २० हप्त्याचं वितरण १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील कार्यक्रमात करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु १८ जुलै रोजी वितरण करण्यात आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. परंतु आता मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाने महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांना दिली आहे.
पीएम किसानच्या २० हप्त्याच्या वितरणाला विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या संभ्रमाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना मेसेजसवर लिंक पाठवल्या जात आहेत. त्या लिंकवर जाऊन केवायसी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे या बनावट मेसेजमधील लिंक्सवर शेतकऱ्यांनी क्लिक करू नये, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच सोशल मिडीयावर पीएम किसानच्या नावे बनावट पेज तयार करून शेतकऱ्यांना लिंक्स पाठवण्यात येत आहेत. त्यावर क्लिक करताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बनावट पेजच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेबद्दलच्या अधिकृत अपडेटसाठी https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच अनोळखी नंबरवरील कॉंल्स आणि मेसेजवर विश्वास ठेवू बँक खात्याचे तपशील किंवा ओटीपी शेयर करू नये, असेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पीएम किसानच्या २० हप्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत. परंतु केंद्र सरकारकडून अद्यापही कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आले नाही. पीएम किसानच्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्याचं वितरण दरवर्षी जून महिन्यात केलं जात होतं. यंदा मात्र जुलै अर्धा सरला आहे, तरीही शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे. यापूर्वी २०२३ मध्ये पीएम किसानच्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्याचं वितरण सर्वात उशिरा म्हणजे २७ जुलै रोजी करण्यात आले होते.
दरम्यान पीएम किसानच्या १९ व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी रोजी बिहार येथील भागलपुरमध्ये कार्यक्रमात केले होते. सुमारे ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २२ हजार कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. तर राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता.