बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो…

राजकीय

मुंबई: बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, ‘बाळासाहेबांचं स्मरण करुन सांगतो आम्ही आता हार मानणार नाही. आम्ही जिंकणार, विधानसभेत विश्वास ठरावही जिंकू. या मंडळींनी खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वेळ निघून गेली आहे.’

आमची शरद पवार, अनिल देसाई, दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. मुख्यमंत्रीही या बैठकीत होते. संपूर्ण तयारी झाली आहे. आता तुम्ही याच, आमचं चॅलेंज आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. हे सरकार पुढची अडीच वर्षं सत्तेत राहील. तसेच पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.