निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा…

राजकीय

मुंबई: दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे, असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

निवडणूक आयोग आपली कार्यवाही सुरु करेल. परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेतो यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाअगोदर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

तुम्ही निवडणुक चिन्ह गोठवण्याबाबत विचारत आहात परंतु निवडणूक आयोग वेगळा विचार करु शकते त्यामुळे काय होणार आहे आणि देशात काय सुरु आहे हे माहीत आहे असेही जयंत पाटील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

आमच्या सरकारच्यावेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता आणि आता त्यांचा वेगळा मूड आहे त्यानुसार सरकार धोरण बदलत आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.