मुले पळविण्याच्या अफवातून मारहाण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा…

क्राईम

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मुले पळविणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा सोशल मिडीयावर सर्रासपणे पसरविण्यात येत आहे. या अफवामुळे निरपराध व्यक्तीला मारहाण करीत कायदा हातात घेतला जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अधीक्षक कलवानिया म्हणाले, अनोळखी महिला, पुरुष, भिकारीसह इतर कोणतीही व्यक्तीची खातरजमा न करताच केवळ वेशभुषा, हालचालीवरुन मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरुन जमाव मारहाण करतात. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. या प्रकारच्या तीन घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत.

भोकरदन ते जालना रस्त्यावर सखाराम जाधव यांच्या दुचाकीला कारचालकाने धडक दिली. यात जाधव यांचा नातु दिपक झरे हा गाडीच्या बोनटवर आदळला. त्यास चालकाने आठ किलोमिटरपर्यंत सिल्लोडच्या दिशेने नेले. मुलाच्या ओरडण्यामुळे नागरिकांनी मुले चोरणारी टाळी असल्याच्या संशयावरुन पाठलाग केला. ८०० ते १००० हजार लोकांच्या जमावाने कारची तोडफोड केली. त्यातील पवन बनकर (रा. गोळेगाव, ता. सिल्लोड) याच्यासह एकाला बेदम मारहाण केली. सिल्लोड पोलिसांनी जखमीची जमावाच्या तावडीतुन सुटका केली.