शिरूर (अरुणकुमार मोटे): गणेशोत्सवात गौरी-गणपतींच्या आगमनाने शिरूर तालुक्यातील गावागावांत पुन्हा एकदा उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: महिलांच्या सहभागातून या उत्सवाला वेगळे पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे पूजन करण्याची प्रथा असून यासाठी परसरातील महिलांना विशेष निमंत्रण देण्यात येते. माहेरी आलेल्या गौरीला पारंपरिक साजशृंगार करून तिच्या सोबत आलेल्या मुलांसह पूजा स्थानी मांडले जाते. या वेळी घराघरांतील देवस्थाने फुलांच्या तोरणांनी, आकर्षक आरासांनी सजविण्यात येतात.
गौरी-गणपतींच्या स्वागतासाठी विविध देखावे उभारले गेले आहेत. त्यात पालखी सोहळा, खेळणी, दिवाळी फराळ, सणासुदीचे पदार्थ, रंगीबेरंगी फुलांची सजावट यामुळे उत्सव अधिकच देखणा दिसत आहे. घराघरांत भक्तिगीते, मंगलारत्या, महिलांच्या गजरामुळे गावात एक वेगळेच मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
गौरी आगमनाची परंपरा शिरूर तालुक्यातील अनेक कुटुंबांत वर्षानुवर्षे सुरू आहे. विशेषत: सविंदणे (ता. शिरूर) येथील सुलभा श्रीधर गुरव यांच्या घरी तब्बल पन्नास वर्षांपासून गौरी आगमनाची परंपरा अखंडित सुरू आहे. गावातील महिला या घरातील गौरी पूजनासाठी विशेष उत्सुक असतात. प्रत्येक वर्षी येथे गौरीची देखणी आरास मांडली जाते. फुलांच्या सजावटीत देवीचे सौंदर्य खुलून दिसते.
यंदाही गुरव कुटुंबीयांनी देवीच्या आगमनासाठी आकर्षक पूजामंडप, पारंपरिक फुलांची आरास व शोभेच्या वस्तूंची सजावट केली आहे. देवीच्या सान्निध्यात महिलांनी व्रते, गीतं, पारंपरिक खेळ व अर्घ्यपूजन करून उत्सव साजरा केला.गणेशोत्सवाच्या जल्लोषात सामील झाल्यानंतर गौरीच्या आगमनामुळे घराघरांत नवी ऊर्जा आणि आनंदाची लहर पसरली असून शिरूर तालुका भक्तिभावाने उजळून निघाला आहे.