पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिरूर तालुका

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद राहत असल्याने पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी टॉवर बंद केला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टॉवर बहुतांश वेळा नागरिक झोपल्यानंतर बंद केला जातो आणि सकाळी पुन्हा सुरू केला जातो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही अशक्य होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याच टॉवरच्या परिसरात मागील वर्षी एका शेतकऱ्याच्या ४७ गोण्या डाळिंब चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे इतर ग्रामस्थ किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे शक्य झाले नसल्याचे समोर आले होते. शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले होते.

टॉवर वारंवार बंद राहत असल्याने चोरीच्या घटनांना चालना मिळू शकते, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत अनेक वेळा जिओ कस्टमर केअरकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही कंपनी प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.

दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवसांत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही, तर रस्ता रोको आंदोलनासह जिओ टॉवरवर चढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पारोडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कोकरे, रविराज टेमगिरे, रजनी अविनाश टेमगिरे व इतर ग्रामस्थांनी दिला आहे.

पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांना अखंडित मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत