शिरुर तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांकडुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरल जातंय वेठीस

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): राज्यात महाविकास आघाडीच सरकार जाऊन शिंदे गट आणि भाजपाच सरकार आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला. तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागल्याने पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते सध्या शिरुरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरत असल्याचे चित्र दिसत असुन आमचं न ऐकल्यास आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना सांगुन तुमच्या इथुन बदल्या करु, अशा प्रकारची भाषा या भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकू येत असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना “म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे” या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

राज्यात गेले अडीच महाविकास आघाडीच सरकार होत. त्यावेळी “सायलेंट मोड” वर असणारे भाजपाचे काही कार्यकर्ते राज्यात पुन्हा शिंदे गट आणि भाजपाच सरकार आल्यानंतर “ऍक्शन मोड” मध्ये आले असुन भाजपामध्ये योग्य पद न मिळाल्याने नाराज होऊन काहीजणांनी पदासाठी इतर संघटनेत प्रवेश केला होता. परंतु नंतर पुन्हा भाजपात पद मिळाल्याने त्यांनी “घरवापसी” केली होती. राज्यात पुन्हा भाजपाच सरकार आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांबरोबर असलेल्या चांगल्या संबंधाचा फायदा घेत शिरुर येथील तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती या अधिकाऱ्यांवर दबाब आणण्याचे काम सध्या त्यांनी सुरु केले असल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

त्यामुळे विनाकारण प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या या भाजपा पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांनी ‘समज’ देण्याची गरज असुन तसे न झाल्यास आम्हाला शिरुर तालुक्यात काम करणे अवघड होणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितले. त्यामुळे आता या भाजपाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेते समज देणार का…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.