उरळगाव येथून १ लाख ५१ हजारांचे डाळींब माल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात डाळींब फळांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्याद शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे (वय 32, व्यवसाय – शेती, रा. आफळे वस्ती, उरळगाव, ता. शिरूर) यांनी दिली आहे.

फिर्यादी यांच्या मालकीच्या गट क्रमांक 510 मधील दोन एकर क्षेत्रातील 252 डाळींब झाडांवरील सुमारे 1512 किलो वजनाचा लाल रंगाचा, गोलसर भगवा जातीचा डाळींब माल, दिनांक 21 जून 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते 22 जून रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादीत माहिती दिली आहे. बाजारभावानुसार प्रत्येकी 100 रुपये प्रति किलो दराने या मालाची एकूण किंमत रु. 1,51,200/- इतकी आहे.

या चोरीबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कृषी क्षेत्रातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या घटनेची नोंद दि. 26 जून रोजी सायंकाळी 7:48 वाजता शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भोते करत आहे.. सदर प्रकरणावर शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही सुरू आहे.

उरळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रगस्ती वाढवाव्यात, शेत परिसरात सुरक्षेची उपाययोजना करावी, तसेच गुन्हा केलेल्या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.