शिरूर (अरुणकुमार मोटे): राऊतवाडी (ता. शिरूर) येथे नागपंचमी सणा निमित्त “माहेरची नागपंचमी” चा सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्यास राऊतवाडीच्या लेकी आणि सुना अशा एकूण २७५ महिलांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या “माहेरची नागपंचमी” या सोहळ्यासाठी राऊतवाडीच्या सासरी असलेल्या सर्व लेकींना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित सर्व लहान मोठ्या मुली पासून ते वयस्कर आज्जी पर्यंत अशा सर्व महिलांनी फुगडी, उखाणे, गाणी, पिंगा, फेर असे विविध पारंपरिक खेळ खेळत त्यांच्या लहानपणीच्या सांस्कृतिक आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमांचे उद्घाटन वाडीतील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते “भारत माता” प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे राऊतवाडीच्या विद्याधाम प्रशाला १९८७ ग्रुपचे वतीने रमेश करपे,विद्या दत्ता घाडगे यांचे प्रेरणेतून सर्व महिलांनी प्रतिकात्मक वृक्षारोपन करून “पर्यावरण पूरक नागपंचमीचा” संदेश दिला. त्यानंतर वाडीतील ई. १० वी व १२ वी च्या यशस्वी मुला मुलींचा पुष्प व भेट वस्तू देऊन त्यांचा प्रोत्साहनात्मक सत्कार करण्यात आला.
या वर्षीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या अवचिते यांच्या “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाने सोहळ्याची रंगत वाढविली. होम मिनिस्टरच्या विविध स्पर्धांमध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. पैठणीची मानकरी ठरलेल्या प्रथम क्रमांक विजेत्या सौ.दिपा गणेश राऊत यांना “पैठणी साडी” भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक विजेत्या प्रतिभा महेंद्र साबळे (बालवडे) व तृतीय क्रमांक विजेत्यावैष्णवी मयूर चव्हाण यांना अनुक्रमे साडी आणि कुकर ही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे राऊतवाडी माहेर असलेल्या झोडगे भगिनी प्रमिला एकनाथ चिपाडे,लता अर्जुन माळी (आक्का), आशा दत्तात्रय नवले, राधिका कैलास भोंगळे यांनी त्यांच्या मातोश्री सीताबाई झोडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्वांसाठी सुरूची भोजन थाळीची व्यवस्था स्वखर्चाने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल चौघीं भगिनींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रियांका शेखर राऊत यांनी केले.उषा तानाजी राऊत, दिपा राऊत, उज्वला राऊत, निकिता राऊत, पौर्णिमा राऊत, सुनीता करपे,मंगल आटकर (म्हेत्रे), कविता राजेश बनकर (राऊत), चैताली गाडीलकर (राऊत) या महिलांनी कार्यक्रमांचे यशस्वितेसाठी विशेष योगदान दिले. मल्हारी म्हस्कु राऊत व श्रीकांत म्हेत्रे यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व्यवस्थेत सहभाग दिला.
ग्रामपंचायत सदस्या उषा तानाजी राऊत यांनी समारोपाच्या भाषणात “आपण अशा प्रकारचा नागपंचमी सोहळा या पुढे दर वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करू या” असा निर्धार व्यक्त करून कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल उपस्थित सर्व लेकी – सुनांचे मनस्वी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.