सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट

महाराष्ट्र राजकीय

“वहिनी सावध असा, झारीतील शुक्राचार्य ओळखा” असा सल्ला

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर लिहिलेल्या दीर्घ आणि भावनिक पोस्टने खळबळ उडवली आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या ४८ तासांत सुरू झालेल्या राजकीय हालचालींवर तीव्र आश्चर्य व्यक्त केलं आहे. “दादांची चिता अजून शांतही झाली नाही आणि त्यांच्या राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाली,” असं म्हणत त्यांनी या घडामोडींना अमानवी आणि क्रूर ठरवलं आहे.

अंधारे यांनी अजित पवारांच्या शेवटच्या दर्शनाचा भावनिक प्रसंगही आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात निष्प्राण अवस्थेत असलेल्या अजित पवारांना पाहिल्याचा क्षण, सुनेत्रा पवार यांची स्थितप्रज्ञ अवस्था आणि त्या काळातील वातावरण याचं त्यांनी अत्यंत हळवे वर्णन केलं आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असताना सुषमा अंधारे यांनी त्यांना थेट सल्लाही दिला आहे. “वहिनी सावध असा,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांकडून होऊ शकणाऱ्या राजकीय डावपेचांबाबत त्यांनी इशारा दिला आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांचा उल्लेख करत “झारीतील शुक्राचार्य ओळखा,” असा सल्ला अंधारेंनी दिला आहे.

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटू शकतो, मात्र दादांनी उभं केलेलं राजकीय साम्राज्य वाचवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य असल्याचं मतही अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत, कठीण काळात नेतृत्व स्वीकारण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

आपल्या पोस्टच्या शेवटी सुषमा अंधारे म्हणतात की, “आम्ही दादांचे राजकीय विरोधक असलो तरी महिला म्हणून जर सुनेत्रा पवार यांच्यावर अन्याय झाला, तर भगिनीभाव जपत आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू.”सुषमा अंधारेंच्या या पोस्टमुळे सुनेत्रा पवारांचा शपथविधी, राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण आणि अजित पवारांच्या वारशाबाबतची चर्चा अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.