मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून यावर्षीच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याची विनंती केली आहे.
मुंबईत दररोज लाखो पर्यटक आणि व्यावसायिक ये-जा करत असतात. शहरात प्रवेश करतानाच मुंबईची वेगळी आणि आकर्षक ओळख निर्माण व्हावी, तसेच जागतिक स्तरावर शहराची प्रतिमा अधिक भक्कम व्हावी, या उद्देशाने चारही प्रमुख प्रवेशबिंदूंवर भव्य प्रवेशद्वार, सौंदर्यीकरण आणि क्लॉक टॉवर उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
महापौरांनी सुचविलेल्या ठिकाणांमध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड चेक नाका, मुलुंड-ऐरोली मार्ग, वाशी-मानखुर्द मार्ग तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर चेक नाका या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व प्रवेशमार्गांवर आकर्षक रचना, प्रकाशयोजना आणि सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
“मुंबईत प्रवेश करतानाच शहराची भव्यता आणि सांस्कृतिक ओळख प्रकर्षाने जाणवली पाहिजे. प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर ही केवळ वास्तू नसून मुंबईच्या अस्मितेचे प्रतीक ठरतील,” असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.या प्रस्तावावर प्रशासन काय निर्णय घेते आणि आगामी अर्थसंकल्पात यासाठी किती निधी राखीव ठेवला जातो, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.