shirur-tehsil-office

शिरूरमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट; निलेश वाळुंज यांचा १५ एप्रिलपासून बेमुदत सत्याग्रह…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. विशेषतः शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आशीर्वादाने १५ एप्रिल २०२६ पासून शिरूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

शिरूर तालुक्यात बिनधास्त बंदूक फायरिंग, भारतीय राज्यचिन्हांचा गैरवापर, एमडी ड्रग्सचा वाढता सुळसुळाट, विविध अवैध धंदे, अवैध उत्खनन तसेच चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून “कायद्याचे राज्य” धोक्यात आले आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. अनेक भागांत रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरत असल्याचे चित्र आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

निलेश वाळुंज यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, ‘सामाजिक हितासाठी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले तहसिलदार यांच्याकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. समाजघातक प्रवृत्तींकडून त्यांना यापूर्वी धमक्या देण्यात आल्या असून त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचाही प्रकार घडला आहे. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.’

दरम्यान, १० एप्रिल रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे विषय पाठविला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्य पातळीवरूनही लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाळुंज यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली व त्यांच्या आशीर्वादाने आंदोलनाचा निर्णय घेतला.

या सत्याग्रहाच्या माध्यमातून वाळुंज यांनी प्रशासनासमोर अनेक ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये शिरूरसाठी कर्तव्यदक्ष व निष्पक्ष पोलिस निरीक्षकांची तात्काळ नियुक्ती, आयपीएस दर्जाच्या डीवायएसपी अधिकाऱ्यांची नेमणूक, एमडी ड्रग्स व गंभीर गुन्ह्यांची उच्चस्तरीय चौकशी, ‘एक गाव-एक पोलिस’ या उपक्रमाची अंमलबजावणी, शिरूर शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना, अवैध धंद्यांवर नियंत्रणासाठी फ्लाइंग स्क्वॉड तयार करणे, तसेच रिक्त पोलिस पदे तातडीने भरणे या मागण्या प्रमुख आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

याशिवाय, पोलिसांकडून नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक दिली जावी, तक्रारींचा योग्य निपटारा व्हावा आणि अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्नापूरसह तालुक्यातील अवैध दारू, गुटखा व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.

“हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून समाजाच्या सुरक्षेसाठी आहे. शिरूर तालुक्यात कायद्याचा धाक अबाधित राहावा आणि नागरिक सुरक्षित वाटावेत, यासाठी हा सत्याग्रह करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय घेतले नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा वाळुंज यांनी दिला. दरम्यान, शिरूर तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा सत्याग्रह महत्त्वाचा ठरणार असून, नागरिकांचे लक्ष आता १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे लागले आहे. प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

शिरुरमध्ये किरकोळ कारणावरुन एका मुलासह आईवर जीवघेणा हल्ला

शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…

शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…