मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत लवांडे यांना थेट इशारा दिला आहे. “महाराष्ट्र ही साधू-संतांची, वारकऱ्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. या पवित्र भूमीत वारकरी संप्रदायाला ‘घुसखोर’ म्हणणे हा केवळ अपमान नसून संत परंपरेवर घाला आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
शिंदे पुढे म्हणाले की, “वारकरी संप्रदायाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. महाराष्ट्रात कोणालाही वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत होणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”तसेच त्यांनी कठोर शब्दांत टीका करत, “अशा लांड्या-लबाड्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. वारकऱ्यांचा, संतांचा किंवा महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही,” असे ठणकावले.
वारकरी संप्रदाय हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या समतेच्या व पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारा असून, कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करतो. या पवित्र परंपरेवर टीका करणे अत्यंत निंदनीय असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.या प्रकरणामुळे वारकरी संप्रदायाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.