भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत आदिवासी विकासासाठी सरकार कटिबद्ध; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

मुंबई: भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कृती संवर्धन आणि हक्कांचे संरक्षण यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकभवनातील दरबार हॉल येथे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी स्वाभिमान, जल-जंगल-जमीन हक्क आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचे प्रतीक आहेत. अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या विचारांतून समाजाला स्वाभिमान, एकता आणि संघर्षाची प्रेरणा मिळते.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी समुपदेशन सुविधा तसेच परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोलीसह दुर्गम भागांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देऊन आदिवासी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय आदिवासींच्या योगदानाचा सन्मान करणारा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारची वचनबद्धता कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत