कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

महाराष्ट्र

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय ४२) यांनी मंगळवारी दुपारी कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद पाटील हे यापूर्वी लष्करी सेवेत १७ वर्षे कार्यरत होते. सध्या ते मीरा-भाईंदर येथे वाहतूक शाखेत पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. त्यातून त्यांनी आठ दिवसांपूर्वी पत्नी व मुलांना सासरच्या घरी पाठविले होते.

मंगळवारी सकाळी ते मुंबईहून गावी आले होते. दुपारी गावाबाहेरील शेतात पंच व दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत वाद मिटल्याचे सांगितले जात आहे. बैठकीनंतर त्यांनी हवेत दोनवेळा गोळीबार केला. उपस्थितांनी याबाबत विचारणा केल्यावर आनंदाच्या भरात गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

हवेत गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पोलिस पाटलांमार्फत चौकशी सुरू केली. त्यावेळी पाटील यांनी सरावासाठी गोळीबार केल्याचे सांगितले. त्यानंतर ते घरातील एका खोलीत गेले आणि दरवाजा बंद करून स्वतःवर गोळी झाडली. गोळी लागल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वडील कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आणि उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.