साथी हाथ बढाना अर्थात… एकमेका सहाय्य करु… अवघे धरु सुपंथ…

महाराष्ट्र

मुंबई: रायगड जिल्ह्याला नैसर्गिक आपत्ती ही काही नवी नाही. परंतु दरवर्षी या जिल्ह्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे गावकरी एकमेकांचे हात हातात घेऊन आलेल्या नैसर्गिक आपत्तीला एकसंघपणे सामोरे जातात आणि त्याला आश्वासक साथ मिळते ती येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज असेच 1 सर्वांना आदर्शवत असे काम झाले ते पेण तालुक्यातील भाल विठ्ठलवाडी येथील खार बंदिस्ती तीन दिवसांपूर्वी जवळपास 80 टक्के खचली होती.

खार जमीन विभागाकडे या बांधबंधिस्तीचे दुरुस्तीचे काम होते. खार जमीन विभागाने हे काम तातडीने पूर्ण होईल यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र आजचे आलेले उधाण हे मोठे असल्यामुळे झालेले काम देखील नष्ट झाले. त्यात या दुरुस्ती कामासाठी मजूर कमी पडत होते. सर्वांसमोर बाका प्रसंग उभा राहिला. भारतीय वायुसेनेवर आधारित “भूज” या चित्रपटातील एक प्रसंग या निमित्ताने डोळ्यासमोर आला.

पाकिस्तानी सैन्याने हवाई हल्ल्यांमुळे भूज येथील भारतीय हवाई दलाची धावपट्टी उध्वस्त केली होती. मात्र त्यावेळी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता ही धावपट्टी एका रात्रीत पुन्हा व्यवस्थितपणे वापरता येईल अशा पद्धतीने दुरुस्त केली,तयार केली. नेमका हाच प्रसंग आज भाल विठ्ठलवाडी येथे पाहायला मिळाल. तातडीने मजूर उपलब्ध होणार नाही, हे लक्षात येताच पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसिलदार कालेकर, खार जमीन विभागाचे कार्यकारी अभियंता सावंत तसेच पेण तहसील कार्यालयाचे इतर अधिकारी-कर्मचारी, सरपंच वढव यांनी गावकऱ्यांना एकत्र केले. त्यांना धीर दिला, त्यांच्यात एक विश्वास निर्माण केला की, आपण सर्वांनी मिळून जर श्रमदान केले तर निश्चितच हे खार बंदिस्तीच्या तात्पुरत्या उपाययोजनेचे काम लवकर होईल आणि आजूबाजूच्या गावांवर आलेला धोका निश्चितपणे टळू शकेल. विशेष म्हणजे वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरनावर आणि त्यांचे पोलीस सहकारी कर्मचारी येथील गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गेले तीन दिवस या ठिकाणी तळ ठोकून होते.

मग काय सगळेजण कामाला लागले. सर्वांनी एकमेकांच्या हात हातात घालून एकजुटीने जमेल ते काम करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम खार बंदिस्तीच्या तात्पुरत्या उपाययोजनेचे काम काम योग्य वेळेत करता आले आणि आजूबाजूच्या गावांवर आलेले मोठे संकट टळले. या प्रसंगातून गावकऱ्यांच्या एकजूटीची आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यतत्परतेची सर्वांना प्रचिती आली. आणि हे काम करण्याला हिम्मत दिली ती रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.योगेश म्हसे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के आणि पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी यामुळे साथी हाथ बढाना आणि एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ या पंक्ती प्रत्यक्षात पेण तालुक्यातील या कामामुळे प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्या.