‘मिसिंग लिंक’ धोकादायक; भ्रष्टाचाराचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा; अनंत गाडगीळ

महाराष्ट्र

मुंबई: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी या प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी (ऑडिट) करण्याची मागणी केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डोंगराळ भागातील बोगद्यांच्या आतील भागाला मजबुती देण्यासाठी जाड काँक्रीटचे लायनिंग केले जाते. हे लायनिंग निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीच्या पद्धतीने झाले असल्यास पावसाळ्यात डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे ते निकामी ठरू शकते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांवरून ही बाब स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.

युरोपियन मानकांनुसार अशा बोगद्यांची १० ते १२ महिने चाचणी करून उणिवा दूर केल्यानंतरच ते वाहतुकीसाठी खुले केले जातात. मात्र, राज्य सरकारने घाईघाईत उद्घाटन केल्याने बांधकामाच्या सुरक्षिततेची आवश्यक तपासणी झाली नसल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला.

मुंबई-पुणे मार्गावर नियमित प्रवास करणारे अनेक टॅक्सीचालक ‘मिसिंग लिंक’चा वापर करण्यास घाबरत असल्याचा दावा करत, संपूर्ण ९ ते १० किलोमीटरच्या मार्गात नैसर्गिक वायुवीजनासाठी अधिक ओपनिंग असलेला पर्याय निवडणे आवश्यक होते, असेही गाडगीळ म्हणाले.

या प्रकल्पासाठी अवघ्या ९ ते १० किलोमीटर अंतरासाठी सुमारे १२ ते १३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या खर्चाचा सविस्तर तपशील राज्य सरकारने जाहीर करावा. जनतेच्या पैशाची लूट झाली आहे का, याचे सत्य समोर यावे म्हणून स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मिसिंग लिंकमधून पहिल्याच प्रवासानंतर हा मार्ग धोकादायक वाटत असल्याची भीती आपण मंत्रालयातील पत्रकारांशी व्यक्त केली होती, असा दावा करत गाडगीळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि “विकासाचे गुजरात मॉडेल नको,” असा टोला लगावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत