रांजणगाव MIDC मधील कंपन्यांची तातडीने सुरक्षा तपासणी करा; नानासाहेब लांडे 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील हजारो कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार सुरक्षा नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की केवळ कागदोपत्री देखावा केला जातो, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. परिसरातील सर्व कंपन्या, कारखाने, गोदामे, बांधकामस्थळे आणि कंत्राटदार आस्थापनांची संयुक्त व अचानक सुरक्षा तपासणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी कामगार उपायुक्तांकडे केली आहे.

याबाबत लांडे यांनी पुणे विभागाच्या कामगार उपायुक्तांना सविस्तर निवेदन दिले असून, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटदारांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ एखादा कामगार जखमी अथवा मृत झाल्यानंतर चौकशीचा फार्स करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापुर्वी प्रतिबंधात्मक तपासणी आणि कारवाई करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हजारो कामगार; मात्र सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न

आशिया खंडातील पंचतारांकित वसाहत असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये लहान-मोठ्या अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कायमस्वरुपी, कंत्राटी आणि परप्रांतीय कामगार काम करतात. मात्र, अनेक ठिकाणी कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविली जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी शूज, हातमोजे, मास्क आणि संरक्षक चष्मे उपलब्ध करून न देणे, उंचावर काम करताना सुरक्षा जाळी व मजबूत आधारव्यवस्था नसणे, यंत्रसामग्रीला सुरक्षा कवच नसणे, विद्युत उपकरणांची वेळेत तपासणी न करणे, अग्निशमन यंत्रणा अपुरी ठेवणे, आपत्कालीन मार्ग बंद असणे आणि कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण न देणे, असे गंभीर प्रकार काही आस्थापनांमध्ये घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उत्पादन वाढविण्यासाठी कामगारांवर दबाव टाकला जातो; मात्र त्याच कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खर्च करण्यास काही व्यवस्थापन आणि कंत्राटदार हात आखडता घेत असल्याचे वास्तव आहे. कामगारांचा जीव धोक्यात घालून उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाचा नेमका अंकुश आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

रांजणगाव MIDC परिसरातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल आणि रोजगार मिळतो. मात्र, याच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सक्षम, सातत्यपूर्ण आणि पारदर्शक तपासणी यंत्रणा दिसत नसल्याची खंत कामगारांमधून व्यक्त होत आहे.

कामगार विभागाने आतापर्यंत किती कंपन्यांची तपासणी केली…? किती कंपन्यांना नोटिसा बजावल्या..? किती कंपन्यांवर दंडात्मक कारवाई झाली..? किती धोकादायक कामे बंद करण्यात आली…? औद्योगिक अपघातातील किती कामगार कुटुंबांना नुकसानभरपाई मिळाली…? या सर्व बाबींचा तपशील प्रशासनाने जाहीर करणे आवश्यक आहे.

प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल न घेतल्यास कामगारांच्या सुरक्षिततेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नानासाहेब लांडे यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती पुणे जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रांजणगाव येथील प्रादेशिक अधिकारी, रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि कामगार सुरक्षा विभागाला देण्यात आल्या आहेत.

आता प्रशासन या गंभीर मागणीवर तातडीने विशेष मोहीम राबवते की पुढील दुर्घटनेची वाट पाहते, याकडे रांजणगाव MIDC परिसरातील हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

(क्रमश:)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत