शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती, संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शिरूर तालुक्यात २०१९ पासून बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची ही १३ वी घटना आहे. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (वय ५, सध्या रा. पिंपळसुटी, मूळ गाव पाथर्डी, जि. अहिल्यानगर) ही आपल्या आई-वडिलांसह पिंपळसुटी येथील शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी वास्तव्यास होती. बुधवारी पहाटे आई-वडील व भाग्यश्री गोठ्याबाहेर झोपलेले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक चिमुकलीवर झडप घातली. हल्ला होताच भाग्यश्रीने मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आई-वडील जागे झाले आणि त्यांनी बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणार्धात बिबट्याने भाग्यश्रीला ऊसाच्या दाट शेतात ओढून नेले. ग्रामस्थांनीही तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर ऊसाच्या शेतात भाग्यश्रीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
भीतीचे सावट; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप…
पिंपळसुटीसह परिसरात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकरी, ऊसतोड कामगार आणि ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक घाबरत असून, रात्रीच्या वेळी शेतात जाणेही धोकादायक बनले आहे.
ग्रामस्थांनी वन विभागावर नाराजी व्यक्त करत, बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि प्रभावित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने ठोस उपाययोजनांची गरज…
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांचा वावर वाढत आहे. वन विभागाने केवळ घटनेनंतर पंचनामा करण्यापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती, पिंजरे उभारणे, रात्री गस्त आणि धोकादायक भागांचे सर्वेक्षण तातडीने हाती घेणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, भाग्यश्रीच्या मृत्यूने ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शिरूर तालुक्यात बिबट्याने घातली महिलेवर झडप अन् ती झडप…
कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भरदिवसा बिबट्याचा हल्ला; तरुण शेतकरी गंभीर जखमी, परिसरात दहशत
शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…