रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोचालकाचा टेम्पो आणि रॅम्पच्या दरम्यान अपघात झाल्याने चेंगरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि १९) जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर मृत चालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी कंपनी प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे मृत चालकाच्या पत्नीला १४ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच कंपनीत कायमस्वरुपी नोकरी देण्यात आली आहे.
दिलीप आत्माराम राठोड (वय ३४) असे मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. राठोड हे टेम्पोमधून माल घेऊन रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत आले होते. कंपनीच्या आवारात टेम्पो आणि रॅम्पच्या मधोमध ते अडकले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी शिरुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अवघ्या ३४ व्या वर्षी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबीयांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले. या घटनेची माहिती मृत चालकाच्या नातेवाईकांनी रांजणगाव गणपती येथील कामगार नेते नानासाहेब लांडे यांना दिली. माहिती मिळताच लांडे यांनी तातडीने शिरुर येथील खाजगी रुग्णालयात धाव घेत मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली. तसेच घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
दिलीप राठोड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कंपनीने केवळ तात्पुरती आर्थिक मदत न देता कुटुंबाच्या भविष्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका नानासाहेब लांडे यांनी कंपनी प्रशासनासमोर मांडली. कंपनी व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेत मृत चालकाच्या कुटुंबाची परिस्थिती, त्यांच्यावर असलेली जबाबदारी आणि भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या चर्चेनंतर कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत मृत चालक दिलीप राठोड यांच्या पत्नीला नुकसानभरपाई म्हणून १४ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीला कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देत कुटुंबाला दीर्घकालीन आर्थिक आधार देण्यात आला. कंपनीच्या या निर्णयामुळे दुःखात असलेल्या राठोड कुटुंबाला मोठया प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
एखाद्या दुर्घटनेत गेलेला व्यक्ती परत येऊ शकत नसला, तरी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि कायमस्वरुपी रोजगार मिळवून देण्यासाठी कामगार नेते नानासाहेब लांडे यांच्या मध्यस्थीनंतर कंपनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत राठोड कुटुंबाला मोठा आधार दिला. त्यामुळे नानासाहेब लांडे यांनी केलेल्या मध्यस्थीचे रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कामगार वर्गातून कौतुक होत आहे.