‘त्यांचा कचरा जळतोय पण साहेब इथं आमचा जीव जळतोय’ रांजणगावमध्ये सर्वसामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक तसेच बाहेरचे भंगार व्यावसायिक यांनी औद्योगिक वसाहतीतुन आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. तसेच धुरामुळे आसपासच्या परीसरातील झाडे, पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. परंतु प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचेच भंगार गोळा करण्याचे ठेके आहेत. हे ठेके मिळविण्यासाठी अनेकवेळा जीवघेणा संघर्षही झालेला आहे. रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे भंगार तसेच कचरा गोळा करुन ते कारेगाव, रांजणगाव तसेच ढोकसांगवी या परीसरातील मोकळ्या जागेत साठवले जाते. त्यात काही कचरा हा धोकादायक स्वरुपाचा असतो. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हि कंपनी किंवा संबंधित ठेकेदाराची असते. परंतु हे ठेकेदार हा धोकादायक कचरा रात्रीच्या वेळेस मोकळ्या जागी किंवा निर्जनस्थळी टाकुन पेटवून देतात. त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात प्रदूषण होऊन आसपासच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे.

 

रांजणगाव गणपती येथील फंडवस्ती जवळ गेल्या अनेक दिवसांपासुन असाच धोकादायक कचरा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र यामुळे या परीसरातील जनजीवन विस्कळित होऊ लागले असुन जाळलेल्या कचऱ्याच्या धुराचा थेट पशुधन, झाडे तसेच मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाने या संबंधित भंगार व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी प्रताप फंड व विवेकानंद फंड यांनी केली आहे.

शिरुरचं प्रशासन कोमात भंगार ठेकेदार जोमात…
रांजणगाव गणपती येथील काही स्थानिक भंगार व्यावसायिक तसेच काही बाहेरगावचे भंगार व्यावसायिक यांच्या अभद्र युतीमुळे फंडवस्ती इथं हा भंगार कचरा आणला जातो. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्या या भंगार कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदारांना देतात. परंतु संबंधित ठेकेदार हे या भंगार कचऱ्यावर कोणत्याही स्वरूपाची प्रक्रिया न करता रात्री उशिरा जाळून टाकतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वायु प्रदूषण होऊन स्थानिक नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु राजरोजपणे हा सगळा प्रकार चालु असताना स्थानिक प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक, तलाठी, पोलिस नक्की काय करतात…? असा प्रश्न निर्माण होत आहे. या भंगार ठेकेदारांकडुन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठया प्रमाणात ‘आर्थिक मलिदा’ मिळत असल्याने अधिकारी जाणीवपुर्वक याकडे कानाडोळा करत असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.