धक्कादायक! किरकोळ कौटुंबिक वादातून एकाचा खून

क्राईम महाराष्ट्र

तारळे: किरकोळ कारणावरून घरात वादावादी करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबातीलच सदस्यांनी संगनमताने जबर मारहाण केल्‍याने एकाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना सवारवाडी (कडवे बुद्रुक, ता. पाटण) येथे घडली. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्‍यात पत्‍नी, मुलगा, मुलगी यांच्‍याविरुद्ध खुनाचा गुन्‍हा दाखल झाला आहे. या घटनेने तारळे विभाग हादरला आहे.

पोलिसांच्‍या माहितीनुसार, डोंगरावर वसलेल्‍या सवारवाडीतील ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजता घडल्‍याची माहिती आहे. मृत व्यक्ती नेहमीच शिवीगाळ करून घरच्यांशी भांडण करायचा. मद्यपान करून त्रास द्यायचा, आवडीची भाजीच केली नाही, अशा किरकोळ कारणांवरून पत्नी व मुलीस मारहाण करत होता. यातूनच ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याप्रकरणी मृताचा मुलगा हरीश खरात (वय २२), पत्नी लक्ष्मी खरात (वय ४२, रा. कडवे बुद्रुक) यांच्‍यासह मुलगी अश्विनी उमेश शिंदे (वय २४, रा. नागठाणे, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी, रमेश खरात हा व्यसनी होता. तो किरकोळ कारणावरून नेहमी वादावादी करून घरच्‍यांना शिवीगाळ करून भांडायचा, असा जबाब दिला आहे.

शुक्रवारी (ता. २५) रात्री आवडीची भाजी केली नाही, या किरकोळ कारणावरून पत्नी लक्ष्मी रात व मुलगी अश्विनी शिंदे यांना त्‍याने मारहाण केली होती. या अशा रोजच्या त्रासाला कंटाळून या तिघांनी संगनमत करून लाकडी दांडक्याने व हाताने रमेश खरात याच्‍या हातापायावर व इतरत्रही जबर मारहाण केली.

या मारहाणीमुळे गंभीर जखमी झाल्याने तो घरातच बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला कोणत्याही वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले नव्‍हते. त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद पोलिस हवालदार राजकुमार कोळी यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्‍यावरून तिघांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३ (५) प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.