सरकारी अधिकारी असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने संपवलं जीवन

क्राईम महाराष्ट्र

आकुर्ली: सरकारी अधिकारी असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मुंबईत म्हाडा प्राधिकरणात पती उपनिबंधक आहे. तर महिला शिक्षिका होती. आकुर्ली इथं ही घटना घडलीय. रेणु कटरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे तर बापू कटरे असं उपनिबंधक अधिकाऱ्याचं नाव आहे.

हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्यानं रेणू यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रेणू या पतीसोबत कांदिवलीत उच्चभ्रू सोसायटीत राहत होत्या. आत्महत्येआधी त्यांनी भावाला फोन केला होता. सासरी होणाऱ्या त्रासाबद्दल भावाला सांगितलं होतं. तसंच हा त्रास कधीच थांबणार नाही, मी त्यांना नकोय असं भावाला फोनवरून रेणू यांनी सांगितलं होतं.

रेणू यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी आरोप केला की, बापू कटरे यांनी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं सांगत पत्नी रेणूला अनेकदा हिणवलं होतं. तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही असं म्हणत कमीपणा देण्याचा प्रयत्न केला होता.

हुंडा कमी दिल्यानं सासरी रेणूला टोमणे मारले जात होते. माहेरहून पैसे आणण्यासाठीही तगादा लावला जात असे. लग्नानंतर रेणूच्या वडिलांनी ८ तोळ्यांच्या बांगड्या दिल्या होत्या. २०२३ मध्ये १२ लाख, २०२४ मध्ये १० लाख रुपये सासरच्या मंडळींना दिले होते असंही रेणू यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितलं.

बापू कटरे यांच्यासह सासू-सासऱ्यांकडून रेणूचा मानसिक छळ केला जात होता. तिला काठीने मारहाण केली जात होती. वाद मिटवण्यासाठी बैठकही बोलावली होती पण ऐनवेळी बापू कटरे यांनी बैठकीला येणार नसल्याचं सांगितलं. यामुळे अस्वस्थ झालेल्या रेणूने माहेरी फोन केला होता असंही त्यांच्या भावाने सांगितलं.

रेणू यांच्यावर एका डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. त्यांनाही फोन करून रेणू यांनी सांगितलं की, पतीनं फसवलं, तो मिटिंग टाळतोय, मी त्यांना नको आहे. यानंतर रेणू यांनी स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं आणि गळफास घेतला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी रेणू कटरे यांचे पती बापू कटरे यांना अटक केलीय.