मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज आणि चेक बाउंस प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपालने पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
अडचणीच्या काळात काही मोठ्या कलाकारांनी मदत केल्याच्या चर्चांवर बोलताना राजपाल म्हणाला की, “मी मिळालेल्या प्रत्येक मदतीचा आदर करतो. मात्र मला सहानुभूती नको आहे. मला जे काम मिळत आहे, त्यातूनच लोक माझ्या पाठीशी असल्याचे दिसून येते.”
राजपाल यादव अडचणीत असताना सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांनी आर्थिक मदत केल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांवर त्याने थेट भाष्य टाळले आणि स्वतःच्या स्वाभिमानावर भर दिला.
‘मी फ्रॉड असतो तर काम मिळाले असते का?’
२०१२ मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर काहींनी मला ‘फ्रॉड’ म्हटले, असे सांगत राजपाल म्हणाला, “त्या काळापासून आजपर्यंत मला दरवर्षी किमान १० चित्रपट मिळाले आहेत. जर मी खरोखर फसवणूक केली असती, तर इंडस्ट्रीत कोणी माझ्यासोबत काम केले असते का? मला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही.”
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल पुन्हा कामात सक्रिय झाला आहे. नुकताच एका लग्नसमारंभातील त्याचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या सर्व कायदेशीर अडचणींनंतरही त्याचा उत्साह कमी झालेला नसल्याचे यातून दिसून येते.
नेमके प्रकरण काय?
२०१० मध्ये राजपाल यादवने स्वतः दिग्दर्शित केलेल्या अता पता लापता या चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट अपयशी ठरल्यामुळे तो कर्ज फेडू शकला नाही. व्याजासह ही रक्कम सुमारे ९ कोटींवर पोहोचली.
चेक बाउंस प्रकरणी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. अडीच कोटी रुपये जमा केल्यानंतर त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आर्थिक व्यवहारांबाबत कलाकारांनी घेतली पाहिजे ती काळजी आणि जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली आहे.