शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. येथील ग्रामपंचायत कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, कान्हूरमेसाई येथील तक्रारदाराच्या जागेवर काही व्यक्तींनी अतिक्रमण करुन घर उभारले होते. या प्रकरणात संबंधितांनी ग्रामसेवकाकडून नियमबाह्य पद्धतीने ८-अ उतारा तयार करुन घेतल्याचा आरोप आहे. याबाबत न्याय मिळावा म्हणून तक्रारदाराने शिरुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी भरत गायकवाड याने तक्रारदाराकडे थेट १० ते १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

इतकेच नव्हे, तर ही लाच स्वतःसाठी आणि ग्रामसेवकासाठी असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. या मागणीने संतप्त झालेल्या तक्रारदाराने पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. ६ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने सापळा रचून पडताळणी केली असता, गायकवाड याने स्वतःसाठी आणि ग्रामसेवक घासले यांच्या नावाने २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर काल बुधवार दि १ एप्रिल २०२६ रोजी एसीबीने कारवाई करत गायकवाडला अटक केली. सायंकाळी सातच्या सुमारास ही कारवाई पार पडली असून, शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतीतच लाचखोरीचे जाळे उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “सामान्य नागरिकांच्या न्यायासाठी असलेली यंत्रणा जर लाचेच्या विळख्यात अडकली असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा…?” असा सवाल आता नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. या कारवाईमुळे कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील इतर व्यवहारांवरही संशयाची सावली पडली असून, एसीबी आणखी धागेदोरे उकलणार का…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.