शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील भीमा नदीपात्रातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवसाढवळ्या सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी पुन्हा एकदा तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. वारंवार तक्रारी करुनही संबंधित विभागाकडुन ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप अर्जदार निलेश भुजंग कोंडे यांनी केला आहे.
याबाबत निलेश कोंडे यांनी ३ जुलै २०२६ रोजी शिरुरच्या तहसिलदार कार्यालयात निवेदन दिले असुन या निवेदनात म्हटले आहे की, दि २८ जुन पासुन आजपर्यंत भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असुन हा प्रकार उघडपणे सुरु आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी अर्ज करुन माहिती देण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर, अवैध वाळू उपशाचे व्हिडिओ पुरावेही प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. मात्र, ५ ते ६ दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निवेदनात तक्रारदाराने तहसीलदारांकडे स्पष्ट मागणी केली आहे की, तात्काळ घटनास्थळी पाहणी करुन अवैध वाळू उपशात वापरण्यात येणारी सर्व वाहने जप्त करावीत तसेच चालक, मालक आणि संबंधित कामगारांविरोधात गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करावी.
तसेच या प्रकरणाची प्रत जिल्हाधिकारी, पुणे आणि उपविभागीय अधिकारी, पुणे यांनाही माहिती व आवश्यक कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. आता या गंभीर आरोपांनंतर महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणा नेमकी काय भूमिका घेणार, अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी तातडीची कारवाई होणार का, याकडे शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तक्रारदाराला मोबाईलवरुन शिवीगाळ व धमकी…
गणेगाव दुमाला येथील तक्रारदार निलेश कोंडे यांना मोबाईलवरुन शिवीगाळ करुन “तुला बघून घेतो” अशा स्वरुपाची जीवे मारण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कोंडे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात संतोष वसंतराव फराटे (रा. मांडवगण फराटा ता. शिरुर, जि.पुणे) यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यामुळे तक्रारदाराचा जीव गेल्यावर प्रशासन कारवाई करणार का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध मुरुम उपसा तसेच वाळू उपसा सुरु असताना महसुल आणि पोलिस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना मोठया प्रमाणात ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असताना हि ‘मलिदा गँग’ स्वतःच्या फायद्यासाठी अवैध मुरुम आणि वाळू उपशाकडे जाणीवपुर्वक तक्रारदारांच्या अर्जाकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे ‘कायदा अन सुव्यवस्था’ धोक्यात आली असुन एखाद्या तक्रारदाराचा जीव गेल्यानंतर प्रशासन कारवाई करणार का…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
(क्रमश:)
रांजणगाव MIDC पोलिसांनी नागरिकांना दिले ‘सरप्राईज गिफ्ट‘
रांजणगाव सांडस येथे ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या कॉइलची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
रांजणगाव पोलिसांची संवेदशीलता; जबरी चोरीनंतर अपघाती मृत्यू झालेल्या महिलेला दिला न्याय