ashok pawar

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते दिवाळीनिमित्त शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी काही जुन्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले सन १९८० साली निवडणुक झाली. त्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली ५८ आमदार निवडुन आले. त्यामुळे मी विरोधी पक्ष नेता झालो आणि विरोधी पक्षाचं काम करायला लागलो. पण आठ दिवसांसाठी मी काही कामानिमित्त ‘इंग्लंड’ ला गेलो. इंग्लंड वरुन परत आल्यानंतर ५८ पैकी ५२ लोक पक्ष सोडुन गेले आणि मी फक्त ६ लोकांचा नेता राहिलो अशी स्थिती महाराष्ट्राने पाहिलेली आहे.

पण त्यानंतर महाराष्ट्रात जी निवडणुक झाली. त्या निवडणुकीत पक्ष सोडुन गेलेले ५२ लोक पराभुत झाले. कारण सर्वसामान्य लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. या निवडणुकीत अशीच स्थिती महाराष्ट्रात होणार असुन मी महाराष्ट्रात दौऱ्यानिमित्त फिरत असताना जे निष्ठावंत आहेत त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करायची असं मतदारांनी ठरवलं असुन त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात यावेळी अशोक पवार यावेळी नक्कीच विजयी होईल असे यावेळी शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, एक काळ असा होता की विकासात महाराष्ट्राचा नंबर पहिला होता. परंतु सध्या विकासात महाराष्ट्राचा नंबर हा सहावा आहे. बाकीची राज्य पुढे गेली मात्र महाराष्ट्र आज विकासाबाबत पाठीमागेच आहे. कारण ज्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे. त्यांना या सत्तेचा उपयोग कशासाठी करायचा याची जाण नाही.

 

शरद पवारांकडुन अशोक पवारांचे कौतुक… 

राजकीय जीवनात वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजहितासाठी समाजसेवेला वाहुन घ्यावे लागते. आमदार अशोक पवारांनी ज्या प्रकारे शिरुर-हवेलीच्या सार्वांगिण विकासाचा आलेख उंचावला आहे, तो दखलपात्र आहे. ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता सक्रिय असते तोच खरा नेता असतो. आज ज्या प्रकारे शिरुर-हवेलीची जनता अशोक पवारांच्या पाठीशी ठामपणे, निष्ठेने आणि विश्वासाने उभी आहे. ते पाहुन अशोक पवार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आहेत. हेच अधोरेखित होते, अशी स्तुती सुमने शरद पवार यांनी अशोक पवार यांच्यावर उधळली.