शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत यंदा ‘हृदयाचा’ मुद्दा तापला आहे. अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना बदलीत सवलत न देण्याचा नियम असतानाही पुणे जिल्हा परिषदेसह अनेक जिल्हा परिषदांनी तो नियम पायदळी तुडवला आहे . यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांचे मन सुन्न झाले असून, संपूर्ण बदली प्रक्रिया नियमाप्रमाणे पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे
ग्रामीण विकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट शब्दांत नमूद आहे की, “बायपास, ओपन हार्ट, इम्प्लांट यांसारख्या गंभीर हृदयशस्त्रक्रियांना सवलत; अँजिओप्लास्टीला नाही!”यामागे न्यायालयीन निकालाचा आधार घेण्यात आला आहे, ज्यात अँजिओप्लास्टीला शस्त्रक्रियेच्या प्रकारात न धरल्याचे म्हटले आहे. तरीही, अनेक जिल्हा परिषदांनी बदली प्रक्रियेत या शिक्षकांना ‘विशेष लाभ’ दिला, हे उघड झाले आहे.
अँजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांच्या भावना मात्र उफाळून आल्या आहेत. “हृदयविकाराचा झटका बसल्यानंतरच अँजिओप्लास्टी करावी लागते. चार-पाच स्टेंट टाकले तरी हृदय पूर्वीसारखे राहत नाही, मग आम्हाला सवलतीबाहेर का ठेवावे?” असा संतप्त सवाल एका शिक्षकाने केला आहे. “या निर्णयामुळे छातीत कळ येतेय!” असाही सूर शिक्षकांमधून ऐकावयास मिळत आहे
यंदाच्या बदल्यांमध्ये पदोन्नती, संचमान्यता, समानीकरण आणि अतिरिक्त शिक्षक यांसारख्या सगळ्याच मुद्द्यांवर गोंधळ उडालेला आहे. न्यायालयीन खटले सुरू असून, ३१ मेपूर्वी बदल्या पूर्ण करण्याचा शासन आदेश हवेतच विरला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना अचानक बदल्यांचा घाट घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
चुकीचा लाभ दिल्याने संवर्ग ४ मधील शिक्षकांवर मोठा अन्याय होत आहे. ते ३-५ वर्षे दूरवर हलवले जाणार असून, यातून वैयक्तिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने प्रक्रियेतील नियमानुसार त्रुटी दुरुस्त करून योग्य पद्धतीने पारदर्शी बदल्या राबवाव्यात, चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य बदल्या केल्याने कारवाई करण्याची मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.
(क्रमशः )