शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना शेती खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला.

सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ‘शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सांगता सभेत बोलताना सपकाळ यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा व धान यांसारख्या पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, नैसर्गिक आणि प्रशासनिक अशा दुहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर आंतरराष्ट्रीय करारांबाबतही गंभीर आरोप केले. या करारांचा विपरीत परिणाम भारतीय शेतीवर होईल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या आणखी कमकुवत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

इतिहास आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर बोलताना सपकाळ यांनी काही व्यक्तींवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप केला. महाराष्ट्राची परंपरा बदलण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर भाजपने केलेल्या जल्लोषावरही त्यांनी टीका केली. राज्यात शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रकार सुरू असताना जल्लोष करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.या कार्यक्रमात राहुल बोंद्रे आणि हनुमंत पवार यांनीही भाजप सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची मागणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत