बारामतीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम महाराष्ट्र

बारामती (पुणे): प्रेमसंबंधातून झालेल्या कथित फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) असे आहे. याप्रकरणी त्याचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सृष्टी विकास मते, श्रृती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पाच वर्षांचे प्रेमसंबंध; नंतर लग्नास नकार

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम आणि आरोपी सृष्टी मते यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सुरुवातीला लग्नाचे आश्वासन देण्यात आले; मात्र नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण देत लग्नास नकार देण्यात आला.

२७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रृती यांनी विक्रमला सतत फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचा आरोप आहे.

पुण्यात बोलावून धमकी

५ जानेवारी रोजी विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपी सृष्टीचे वडील विकास मते यांनीही विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सुसाईड नोटमध्ये छळाचा उल्लेख

१५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७:४५ दरम्यान विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी सुसाईड नोट, कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल डेटा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.