भिवंडी: ज्या वयात हातात खेळणी आणि दप्तर असायला हवे, त्या कोवळ्या १२ वर्षांच्या वयात एका निष्पाप मुलाला मृत्यूने कवटाळले. भिवंडीत भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त झालेल्या हामिद खान या चिमुकल्याचा तब्बल २० दिवस मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
१० जानेवारी रोजी खेळत असताना हामिदला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला अँटी-रेबीज आणि टीटी इंजेक्शन देण्यात आले. मात्र इंजेक्शनची कमतरता असल्याचे सांगत डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी ठाण्याला रेफर केले.
ठाण्यात एआरएस (Anti Rabies Serum) इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ठाण्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तसेच वारंवार भिवंडी-ठाणे प्रवास करणे शक्य नसल्याने कुटुंबीयांनी भिवंडीतील सरकारी रुग्णालयातच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
भिवंडीतील रुग्णालयात उर्वरित तीन इंजेक्शन देण्यात आली. डॉक्टरांच्या मते, सर्व उपचार वेळेत आणि योग्य पद्धतीने करण्यात आले होते. मात्र २७ जानेवारीपासून हामिदची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्याला ठाणे आणि पुढे कस्तुरबा रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ३० जानेवारी रोजी हामिदने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, कुटुंबीयांनी भिवंडीतील सरकारी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. “योग्य उपचार न करता फक्त रेफर करण्याचे काम डॉक्टर करतात. वेळेत आणि प्रभावी उपचार मिळाले असते तर आमचा मुलगा आज जिवंत असता,” असा आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, भिवंडीतील डॉक्टरांनी हे आरोप फेटाळले असून, “मुलाचा मृत्यू केवळ रेबीजमुळेच झाला आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अन्य वैद्यकीय कारणेही मृत्यूमागे असू शकतात,” असे त्यांनी सांगितले आहे.
हामिद खानच्या मृत्यूमुळे भिवंडीत शोककळा पसरली असून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, अँटी-रेबीज लसींची उपलब्धता आणि सरकारी रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.