हा महाराष्ट्राचा नव्हे, MMRDA चा अर्थसंकल्प;  विजय वडेट्टीवर यांची सरकारवर उपरोधिक टीका

महाराष्ट्र

मुंबई: विधानसभेत सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा असून त्यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, असा टोला लगावत त्यांनी सरकारवर उपरोधिक निशाणा साधला.

अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवताना वडेट्टीवार म्हणाले की, हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि एमएमआर क्षेत्रासाठी असल्यासारखा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबतही स्पष्टता दिसत नाही.

२०१४ मध्ये काँग्रेसने सत्ता सोडली तेव्हा राज्यावर सुमारे २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते. मात्र आता हे कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले असून सरकार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे, अशीही टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा यंदाही करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार असून प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

सरकारच्या धोरणावर उपरोधिक टिप्पणी करताना त्यांनी शेरोशायरीतून टीका केली –

“तुम्हारी बातों में ऐसे उलझे कि सच समझ ना आया,

चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!”