मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर आता ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले आहे. या नव्या विभागाच्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ११ टक्के इतकी आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने राज्याच्या स्थापनेपासून या घटकांना शिक्षण व नोकरीत आरक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र आजही कडकलक्ष्मी, वैदू, गोंधळी, जोशी, वासुदेव, बहुरूपी, भराडी, डोंबारी, टकारी, रामोशी, लमाण यांसारख्या सुमारे ४० जमाती पारंपरिक भटकंती आणि व्यवसायामुळे संघटित स्वरूपात मुख्य प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत.
या विखुरलेल्या आणि वंचित समाजघटकांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेसने व्यक्त केला आहे. विभागाला अधिक बळकटी देण्यासाठी स्वतंत्र ‘विभाग’ स्थापन करून त्याची जबाबदारी ॲड. पल्लवी रेणके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या प्रश्नांना संघटित आणि प्रभावीपणे हाताळले जाईल, असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाने व्यक्त केला आहे.