संगमनेर: संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमातून झालेले एक राजकीय वक्तव्य सध्या खूप चर्चेत आले आहे. आता ते वक्तव्य मोठ्या वादाला तोंड देत असून स्थानिक राजकारण तापले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे.
शनिवारी रात्री घुलेवाडी येथे कीर्तनात भंडारे यांनी राजकीय भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून उपस्थित काहींनी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यानंतर भंडारे यांना मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी झालेल्या आंदोलनात शिवसेना आमदार अमोल खताळ व भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले सहभागी झाले. त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी पोलिसांचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार केला.
आजी-माजी आमदार आमनेसामने
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भात आजी-माजी आमदार समोरासमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याचे संकेत आहेत. दरम्यान, विधानपरिषदेचे आमदार व बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत मामांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी लिहिले आहे की, ‘बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना विरोधकसुद्धा शब्द जपून वापरतात. पण एका स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या व्यक्तीने जे वक्तव्य केले ते वारकरी संप्रदायाला मान्य नाही. संगमनेरचे नाव काही जण मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत’.
तांबे यांनी याच पोस्टमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असून, संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करण्यामागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. तर पर्जन्यछायेतील दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला आहे. यामध्ये स्व. भाऊसाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान आहे. संगमनेरच्या स्वाभिमानी जनतेला बदनामी मान्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमात कोणते राजकीय वक्तव्य झाले
घुलेवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित कीर्तनात कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” असे वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
या वक्तव्यामुळे कोणत्या घटना घडल्या
संग्राम भंडारे यांनी कीर्तनात राजकीय आणि हिंदू-मुस्लिम भाष्य केल्याचा आरोप झाला. यावर उपस्थित काहींनी आक्षेप घेत गोंधळ घातला. त्यानंतर भंडारे यांना मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.
या प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांची काय प्रतिक्रिया होती
बाळासाहेब थोरात यांनी धर्माच्या व्यासपीठावरून राजकारण करून संगमनेरचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. तसेच, पोलिसांचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार केला.