मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित” असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’वर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
निकालाच्या पार्श्वभूमीवर दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने कार्यकर्ते भावूक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी विजयाचा जल्लोष करताना संयम राखावा, मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.
बारामतीकरांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “हा शेवट नाही, ही तर नव्या बारामतीची सुरुवात आहे—निर्धाराची आणि संघर्षाची,” असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याचा निर्धारही यावेळी पुन्हा अधोरेखित केला.