राज्यसभा जागेवर काँग्रेसचा ठाम दावा; महाविकास आघाडीची निर्णायक बैठक

महाराष्ट्र

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी आपापली मते मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असून, शिवसेनाही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल, असा विश्वास व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले की, “आम्ही सर्वजण आपल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल.”राज्यसभा उमेदवारी अर्जासाठी ५ मार्चपर्यंत मुदत असल्याने मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मालेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया

मालेगाव प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये. मात्र सध्या रमजानचा महिना सुरू असून रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते. या प्रकरणाचा विनाकारण वाद घातला जात असून तो पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे, असा आरोप त्यांनी केला.

“समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांनाही सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे,” असा टोला त्यांनी लगावला.