मुंबई: कुलाबा येथे आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांचे तसेच पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले. “ताज हॉटेलसमोर उभं राहिलं की त्या दिवसाचे आगीचे आवाज, धूर आणि भीतीचा थरकाप आजही मनात जिवंत आहे. आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात,” अशा शब्दांत त्यांनी त्या काळातील भीषण परिस्थितीचे वर्णन केले.
याप्रसंगी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम दिव्यज फाउंडेशनच्या अमृता फडणवीस यांच्या पुढाकारातून झाला. अमृता फडणवीस यांचं कौतुक करताना शिंदे म्हणाले की, त्यांनी खऱ्या अर्थाने देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती म्हणजे काय आहे ते या कार्यक्रमातून दाखवून दिले. महिलांसाठी आरोग्य मोहीम, गणेश विसर्जनानंतर बीच क्लिनिंग आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांचं काम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी 26/11 हल्ल्यात कसाबला सामोरे गेलेले धैर्यवान अधिकारी सदानंद दाते यांचा विशेष उल्लेख केला. “ते जखमी झाले, पण मागे हटले नाहीत. असा मुंबईचा आत्मा आहे,” असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या कारवायांवर बोलताना शिंदे म्हणाले, “भारतात मोदीजींचे नेतृत्व आहे आणि आपल्या सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. पाकिस्तानने कितीही कट रचला तरी त्यांचे डाव निष्फळ ठरणार आहेत.”
शिंदे म्हणाले, “मुकेशभाईंनी उद्योगाचे साम्राज्य उभं केलं, पण नीता वहिनींनी समाजाचे साम्राज्य घडवले. राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा सन्मान अभिमानास्पद आहे.”
शेवटी शहीद सैनिकांना अभिवादन करत शिंदे म्हणाले, “देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. त्यांना सलाम करणे हीच खरी देशभक्ती.” असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.