मुंबई: अकरावीच्या केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना ईमेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होताच संकेतस्थळ कोलमडणे, नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे, विद्यार्थ्यांना वारंवार प्रतीक्षा करावी लागणे आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणे ही बाब नियमित झाली असल्याचे मातेले यांनी म्हटले आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम व अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“दहावीचा निकाल वेळेत लागतो, मात्र अकरावी प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी विलंब का होतो, याचे स्पष्ट उत्तर शिक्षण विभागाने द्यावे. प्रत्येक वेळी ‘तांत्रिक अडचणी’ हेच कारण पुढे केले जाते. समस्या सातत्याने निर्माण होत असतील, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांना तासन्तास संकेतस्थळावर थांबावे लागत असून मानसिक तणाव वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की प्रवेश प्रक्रियेच्या अनिश्चिततेमध्ये अडकून राहायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे ते म्हणाले.तसेच, प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे अप्रत्यक्षपणे कोचिंग क्लासेसना फायदा होत आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांची मानसिक अवस्था प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपरोधिक शब्दांत बोलताना मातेले म्हणाले, “दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबर ‘तांत्रिक अडचणींचा नवीन सीझन’ सुरू होतो. विद्यार्थ्यांचे भविष्य ‘लोडिंग’मध्ये ठेवण्याचे काम प्रशासनाने थांबवले पाहिजे.”तसेच, “यावर्षीही प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण करून विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.शिक्षण विभागाने तातडीने तांत्रिक यंत्रणा सक्षम करून अकरावी प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.