कोल्हापूर: जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (वय ५२) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवणासाठी घराबाहेर पडलेले पिळणकर अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरच्या दसरा चौकात संविधान हक्क संघर्ष समिती आणि पिळणकर कुटुंबीयांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. “महेश पिळणकर यांचं झालं तरी काय?” असा सवाल करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.
नेमकी घटना काय?
महेश पिळणकर हे ७ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. तपासादरम्यान पाटगावलगत कुलकर्णी यांच्या शेताजवळ त्यांची दुचाकी आढळून आली.
धक्कादायक बाब म्हणजे दुचाकी सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जंगलात जळालेल्या अवस्थेत काही अस्थी (हाडांचे अवशेष) सापडले. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले आणि भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोरक्ष चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून जळालेले अवशेष जप्त करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र हे अवशेष मानवी आहेत की प्राण्यांचे, याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
तिघांना ताब्यात; १०० हून अधिक जणांची चौकशी
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले असून १०० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. तरीही महेश पिळणकर यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.
राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक वैमनस्यातून काही गैरप्रकार घडला आहे का, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. पिळणकर हे काजू उत्पादक व हर्बल व्यापाराशी संबंधित असल्याने त्या क्षेत्रातील वादांचीदेखील चौकशी सुरू आहे.
‘मस्साजोग’ प्रकरणाची आठवण
या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. त्या प्रकरणातही अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता.
पाटगावमध्ये दुचाकी एकीकडे आणि काही अंतरावर जळालेल्या अस्थी आढळल्याने, कोल्हापूरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याची मागणी कुटुंबीय आणि स्थानिकांकडून केली जात आहे.