सर्वसामान्य जनता,शेतकऱ्यांना फसवणारे सरकार पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा

महाराष्ट्र

मुंबई: सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठया प्रमाणात पाऊस सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 अनव्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना केला. या सरकारच्या काळात शेतकरी सुखी नाही त्यामुळे राज्य सुखी सुखी नाही. शेतमालाला हमीभाव देऊ, असे पंतप्रधानांचे आश्वासन होते मात्र हमीभाव तर नाहीच उत्पादनबाबत स्पष्टता नाही. पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा मुंबई पुणे शहरी भागात राहणाऱ्या लोकांनी गावाकडील जमिनीवर विमा काढला आहे. देशाच्या व राज्याच्या कृषिमंत्री यांनी हा घोटाळा मान्य केला आहे. तांड्यावर 400 हेक्टर असताना 4 हजार हेक्टरचा विमा काढला गेला.

परस्पर शेतकऱ्यांच्या नावावर विमा काढला जात आहे. सांगलीतील जत येथे एका शेतकऱ्याच्या नावावर पाच वेळा विमा उतरवला गेला.अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हिंगोली मध्ये गेल्या वर्षी एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही, या जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी दानवे यांनी करत पीक विमा योजनेचा गैरवापर होत असल्याचे आरोप त्यांनी केला. मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, कृषिपंप आदी योजनांच्या घोषणा सरकारने केल्या. मात्र या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करतात शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग होत असल्याचे दानवे म्हणाले.

नांदेडमधील तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या लोकांनी तेलंगणात अनुदान अधिक मिळत असल्यामुळे ठिबक सिंचन योजनेची तेथून खरेदी केली. सरकारकडून लोकप्रिय घोषणा होतात मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने दुर्लक्ष केले जाते. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाची घोषणा सरकारने केली प्रत्यक्षात कुठेही या योजनेची अंमलबजावणी नाही. मातोश्री पाणंद रस्ता योजना मंजूर केली मात्र वाड्या वस्तीवर शेतकऱ्यांना जाण्यासाठी निधीची तरतूद केली नाही. हमीभाव खरेदी धोरण हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे, असे म्हणत दानवे यांनी हे सरकार सामान्य जनता आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्याची टीका केली.