कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी प्रत्येक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने हालचाली करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) राजकारण सध्या प्रचंड तापले आहे.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या नगरसेवकांबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत असून, ठाकरे गटाने थेट ‘नगरसेवक बेपत्ता’ असल्याचे पोस्टर्स लावल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले आहे. अखेर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.
नेमके काय घडले.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट-रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नगरसेवकांचे कुटुंबीयही संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर टीव्ही नाईन मराठीच्या टीमने ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या घरी भेट दिली. तेव्हा मधुर म्हात्रे यांचे आई-वडील आणि कुटुंबीयही आठवडाभरापासून घराबाहेर असल्याची माहिती समोर आली.
याच दरम्यान, कल्याण पश्चिमेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे यांचे पती विनोद केणेही बेपत्ता असल्याचे समोर आले. या सर्व घटनांनंतर नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी ठाकरे गटाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. खासदार संजय राऊत यांच्या आदेशानंतर ही तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.
तक्रारीनंतर नवा ट्विस्ट – कुटुंबीय आक्रमक
ठाकरे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असलेल्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीच आता ठाकरे गटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देत, आमचा मुलगा आमच्या संपर्कात असून त्याला बेपत्ता ठरवून बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे.
या तक्रारीनंतर ठाकरे गटाच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुढे काय?
नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार आणि त्याच नगरसेवकांच्या कुटुंबीयांकडून दाखल झालेली प्रतितक्रार, यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. महापौरपदाच्या गणितात या घडामोडींचा नेमका काय परिणाम होणार, नगरसेवक प्रत्यक्षात कुठे आहेत आणि पोलिस तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.