महाराष्ट्रात खळबळ! साताऱ्यात 6 हजार कोटींच्या एमडी ड्रग कारखान्यावर गुजरात डीआरआयची गुप्त कारवाई

महाराष्ट्र

सातारा: गुजरात राज्यातून आलेल्या नार्को ड्रग पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात केलेल्या धक्कादायक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे असलेल्या एका मोठ्या शेडवर छापा टाकत पथकाने सुमारे 6 हजार कोटी रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग तयार करण्याचा संपूर्ण साहित्यसाठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या अत्यंत गोपनीय कारवाईचे विशेष म्हणजे सातारा पोलिसांनाही याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. आयपीएस दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे विशेष पथक गुजरातमधून थेट साताऱ्यात दाखल झाले होते. कारवाईनंतर हे पथक सध्या कराडमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती आहे.

शेड मालक बाबा मोरे ताब्यात; बिहारमधील तरुणांचा सहभाग

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचपुतेवाडी येथील संबंधित शेडचा मालक बाबा मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या शेडमध्ये एमडी ड्रग तयार करण्यासाठी लागणारे सर्व कच्चामाल, रसायने आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सर्व साहित्य डीआरआय पथकाने ताब्यात घेतले आहे.

या कारखान्यात बिहार राज्यातील काही युवक काम करत असल्याचेही समोर आले असून त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

बाबा मोरे – खून प्रकरणातील प्रमुख आरोपी

या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, बाबा मोरे हा एका गाजलेल्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. महाराष्ट्र केसरी विजेता संजय पाटील यांच्या गोळीबारात झालेल्या खुनाचा मुख्य आरोपी म्हणून बाबा मोरेची ओळख आहे. याशिवाय त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

याच परिसरात त्याचा बनावट दारू बनवण्याचा कारखानाही पूर्वी उघडकीस आला होता आणि त्यावर कारवाई करण्यात आली होती. आता एमडी ड्रग कारखान्याचा पर्दाफाश झाल्याने बाबा मोरेच्या गुन्हेगारी साम्राज्यावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.

सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

विशेष बाब म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वी बामणोली परिसरातही अशाच प्रकारे दुर्गम भागात एमडी ड्रग बनवणारा कारखाना उघडकीस आला होता. त्यावेळी मुंबईहून आलेल्या नार्को पथकाने कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच आता साताऱ्यातील ही दुसरी मोठी कारवाई झाली आहे.

सलग दुसऱ्यांदा बाहेरून आलेल्या पथकांनी कारवाई केल्याने सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नसल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.