kailash Gangawne family

शिरूरच्या शिक्षक कुटुंबावर घाला; आई-वडिलांसोबतचा फोटो ठरला अखेरचा…

शिरूर तालुका

शिरूरः बुलढाण्यातील बस दुर्घटनेने शिरूरच्या एका शिक्षकाच्या कुटुंबावर घाला घातला आहे. पती-पत्नी आपल्या मुलाला नागपूरला महाविद्यालयात सोडायला गेले होते. तिथेच मुलाला निरोप दिल्यानंतर त्यांनी काढलेला अखेरचा फोटोही समोर आला आहे. फोटोत आई-वडील आणि मुलगा आहे, तर मुलीनं हा फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

कैलास गंगावणे असे शिक्षकाचे नाव असून ते आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावातील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विद्यालयात इंग्लिश विषय शिकत होते. कैलास गंगावणे गेल्या 25 वर्षांपासून या विद्यालयात कार्यरत होते. मुलाला नागपूर येथील महाविद्यालयात सोडून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. यात पत्नी कांचन गंगावणे आणि मुलगी सई गंगावणे हिचा मृत्यू झाला आहे.

अपघातात दगावलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवावी लागणार आहे. सरकारी यंत्रणा सध्या बसमधील प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचं काम करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, तर पंतप्रधानांनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

घटनास्थळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचल्यानंतर निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय झाल्यानंतर मृतदेह आमच्या ताब्यात देणार आहेत, असे कांचन गंगावणे यांचे भाऊ अमर काळे यांनी सांगितलं आहे. ते सध्या बुलढाण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. ती वैद्यकीय शिक्षण घेत होती. आई-वडील आणि मुलगी असा तिघांचाही फोन लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आणि बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना या बसमधील लिस्टमध्ये आपले नातेवाईक असल्याचे कळले आणि त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. यात सख्या बहिणीचे कुटुंब उध्वस्त झाल्याचे कळताच अमर काळे यांच्या पायाखालची जमीन हादरली. काळे आणि गंगावणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा झाला अपघात?
बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसनं पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्यानं बसनं वेगानं पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात शिरुर येथील पती-पत्नी व मुलीचा मृत्यू…