मुंबई: महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असून त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी केली जात आहे जेणेकरून विकसित भारत… विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा शब्दात आपल्या भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महिला आणि बालकांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून या शिबिरात सर्वांनी मिळून त्यांचे भविष्य अधिक सामर्थ्यवान बनविण्याचा विचार करूया जेणेकरुन महिला आणि बालविकासाला नवी दिशा मिळेल असेही आदिती तटकरे म्हणाल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सुसूत्रता आणावी अशी भावना आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील बालकांच्या व महिलांच्या उन्नतीसाठी विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्रसरकारकडे दिला असून महाराष्ट्राला केंद्रसरकारचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षाही आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. यावर बोलताना केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला संपूर्ण सहाय्य दिले जाईल असे आश्वासन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपुर्णा देवी यांनी दिले.
हे चिंतन शिबिर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जी, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी, उपमुख्यमंत्री श्रीमती दिया कुमारी, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर आणि भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये पार पडले.