शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपुर्ण तालुका हादरला आहे. करडे येथील भैरवनाथ मंदिराजवळ आठ जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची गंभीर घटना समोर आली असून, संबंधित व्यक्तीने प्रसंगावधान राखत पाण्यात उडी मारल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.

खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि 18) पहाटे सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान भैरवनाथ मंदिर परिसरात संबंधित व्यक्तीला आठ जणांनी घेरले. यावेळी त्याच्यावर दोन वेळा गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या गोळीबारातून जीव वाचविण्यासाठी संबंधित व्यक्तीने जवळील पाण्यात उडी घेतली. अंधाराचा फायदा घेत तो हल्लेखोरांच्या तावडीतून निसटल्याने मोठा अनर्थ टळला. गोळी लागली नसल्याने तो सुदैवाने बचावल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

आठ जणांचे टोळके आणि थेट गोळीबार…

एखाद्या व्यक्तीला घेरुन आठ जणांच्या टोळक्याने थेट गोळीबार करणे ही साधी घटना नसून पुर्वनियोजित कट किंवा गंभीर वैमनस्याचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची ओळख, त्यांनी वापरलेले शस्त्र आणि गोळीबारासाठी कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.

या घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा करडे गावात दाखल झाला असून, भैरवनाथ मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली. गोळीबाराच्या खुणा, रिकाम्या पुंगळ्या, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यावर तपासाची दिशा अवलंबून राहणार आहे.

पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईवर प्रश्नचिन्ह…?

शिरुर तालुक्यात मारामाऱ्या, प्राणघातक हल्ले, अवैध शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांच्या कारवाया आणि गंभीर गुन्हे सातत्याने समोर येत आहेत. आता गावातील मंदिर परिसरातच गोळीबार झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काही गुन्हे घडल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा दाखल होतो, तपास पथके नियुक्त केली जातात आणि आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबविली जाते; मात्र अशा घटना घडूच नयेत यासाठी स्थानिक पातळीवरील प्रतिबंधात्मक पोलिस यंत्रणा कितपत प्रभावी आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

गावागावांत वाढणारे टोळीसंघर्ष, अवैध शस्त्रांचा संभाव्य सुळसुळाट आणि गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली कायद्याची भीती कमी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. गोळीबारासारख्या घटनेने आता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी…

या प्रकरणातील सर्व आरोपींची तातडीने ओळख पटवून त्यांना अटक करावी, वापरलेले शस्त्र जप्त करावे आणि हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आरोपींना राजकीय अथवा अन्य कोणतेही संरक्षण मिळत आहे का, याचाही तपास करणे गरजेचे आहे.

केवळ गुन्हा दाखल करुन किंवा तपास सुरु असल्याचे सांगून हे प्रकरण थंड बस्त्यात टाकता कामा नये. गोळीबार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र होऊ शकते.

शिरूर तालुक्यात ‘कायद्याचे राज्य’ आहे की टोळ्यांचे…?

करडे गावातील ही घटना शिरुर तालुक्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे आणखी एक गंभीर उदाहरण ठरत आहे. आठ जणांचे टोळके एखाद्या व्यक्तीवर खुलेआम गोळीबार करते आणि पीडिताला जीव वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारावी लागते, ही बाब प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे.

शिरुर पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष, वेगवान आणि सखोल तपास करुन आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशी भक्कम कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा शिरुर तालुक्यात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारी टोळ्यांचे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत