पुरंदर: पुरंदर तालुक्यातील गुरोळी गावच्या शेतकरी कुटुंबातील मनीषा रेखा बाळासाहेब खेडेकर यांनी २०२४ मधील राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत २२ वा क्रमांक पटकावत उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) पदासाठी निवड मिळवली आहे. अवघ्या दोन हजार लोकसंख्या असलेल्या गुरोळी गावातून पहिल्या महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान मनीषा खेडेकर यांनी मिळवला असून, त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
हा सत्कार अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित झेंडे आणि उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संपूर्ण गावातून मनीषा खेडेकर यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात आपल्या लेकीच्या यशाचा आनंद साजरा केला.
या कार्यक्रमास उपसरपंच जीवन खेडेकर, माजी उपसरपंच मधुकर खेडेकर, रामचंद्र खेडेकर, हिरामण खेडेकर, विठ्ठल भगत, फ्रूट व्यापारी महादेव शिंगाडे, जलदूत सागर काळे, माऊली मेमाणे, हनुमंत खेडेकर, चंदू खेडेकर, पांडुरंग खेडेकर, अमर खेडेकर तसेच अमरज्योत मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले,“ग्रामीण भागातील मुला-मुलींनी शिक्षणाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले, योग्य मार्गदर्शन घेतले आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम केले तर तेही अशा उच्च पदांपर्यंत निश्चितच पोहोचू शकतात.”
सत्काराला उत्तर देताना मनीषा खेडेकर म्हणाल्या,“माझ्या शिक्षणासाठी आई-वडील आणि कुटुंबीयांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे या यशाचे संपूर्ण श्रेय मी त्यांनाच देते.”मनीषा खेडेकर यांच्या या यशामुळे गुरोळी गावासह संपूर्ण पुरंदर तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.