कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार; विखे पाटील

महाराष्ट्र

संभाजीनगर: शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले शासनाने घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार असून गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अवैध वाळू उपसा केल्याने होणारी पर्यावरणाची हानी आता या शासकीय वाळू केंद्रामुळे नक्कीच कमी होणार आहे. या उपक्रमात परिवहन विभागाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या विभागाने वाळू वाहतूकीचे दर कमी केल्यास सामान्य माणसाला आणखी फायदा होईल. शासनाने स्वस्तात वाळू उपलब्ध करून दिल्याने घराच्या किंमती देखील कमी होतील असेही ते म्हणाले.

नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी यामध्ये असलेल्या त्रृटी दूर करण्याचे प्रयत्न महसूल विभाग करीत आहे. परंतू धोरणाची अंमलबजावणी होवूच नये यासाठी कोणी प्रयत्न करीत असेल तर ते कदापी यशस्वी होणार नाही. येत्या पंधरा दिवसात वाळू विक्री केंद्राच्या सर्व यंत्रणा सुरळीत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.