सलग 25 वेळा तिरंगा फडकावत मोदींच्या नावावर नवा विक्रम; विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’चा संकल्प

महाराष्ट्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा सुमारे 25 वर्षांचा प्रशासकीय प्रवास पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मोदी यांनी आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 13व्यांदा तिरंगा फडकावला.

मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 12 वेळा राज्यस्तरीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहण केले होते. त्यानंतर 2014 पासून पंतप्रधान म्हणून त्यांनी आज 13व्यांदा लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला. त्यामुळे शासनप्रमुख म्हणून सलग 25 वेळा ध्वजारोहण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला.

यापूर्वी सलग 24 वेळा ध्वजारोहण करण्याचा विक्रम पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नावावर होता. मोदी यांनी हा विक्रम मागे टाकला आहे.

प्रशासकीय कारकिर्दीलाही लवकरच 25 वर्षे

मोदी यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्षे पूर्ण होणार आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर मे 2014 मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले.

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवर सलगपणे राहिल्याने प्रशासनाच्या शीर्षस्थानी सर्वाधिक काळ कार्यरत राहण्याचा विक्रमही मोदी यांच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर होता.

2002 मध्ये पहिल्यांदा फडकावला तिरंगा

मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी पहिल्यांदा 15 ऑगस्ट 2002 रोजी गुजरातमध्ये राष्ट्रध्वज फडकावला. गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिक्षण आणि सुशासनावर विशेष भर दिला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देणे, इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन देणे, मदरशांचे आधुनिकीकरण आणि सीमावर्ती भागातील सैनिक शाळांना सक्षम करण्याची भूमिका त्यांनी त्यावेळी मांडली होती.

याच काळात ‘सुशासन’ हा त्यांच्या प्रशासनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला. पुढे गुजरातमध्ये ‘गुजरात मॉडेल’ म्हणून त्यांच्या प्रशासनाची चर्चा झाली आणि 2014 मध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.

पाटणपासून सुरू झाली नवी परंपरा

मुख्यमंत्री असताना मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम केवळ राजधानीपुरता मर्यादित न ठेवता गुजरातच्या विविध शहरांमध्ये आयोजित करण्याची परंपरा सुरू केली. 15 ऑगस्ट 2003 रोजी पाटणमध्ये राज्यस्तरीय स्वातंत्र्यदिन सोहळा आयोजित करण्यात आला.

त्यानंतर गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा मुख्य राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्याची ही परंपरा पुढे सुरू राहिली. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतरही ही परंपरा कायम राहिली.

2013 मध्ये लाल किल्ल्याची हाक; 2014 मध्ये प्रत्यक्ष ध्वजारोहण

मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी 15 ऑगस्ट 2013 रोजी कच्छमधील भुज येथून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशाचे नेतृत्व करण्याचा स्पष्ट संदेश दिला होता. त्यानंतर अवघ्या वर्षभरात 15 ऑगस्ट 2014 रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला.

पहिल्याच भाषणात त्यांनी स्वच्छ भारत अभियान, शौचालयांची निर्मिती आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्य दिले. त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून मोठी उद्दिष्टे आणि त्यासाठीचा रोडमॅप मांडण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली.

2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. देशाच्या सामूहिक शक्तीच्या माध्यमातून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘सप्तधारा’च्या माध्यमातून पुढे जाण्याची भूमिका त्यांनी मांडली.

तरुण, शेतकरी, महिला आणि विशेषतः Gen-Z कडून मोदी यांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. Gen-Z साठी मोफत ऑनलाइन कोचिंग, AI प्रशिक्षणासह कौशल्यविकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या घोषणाही त्यांनी केल्या.

गेल्या 25 वर्षांच्या प्रशासकीय प्रवासानंतर आता विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशातील तरुणाईसह समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेण्याचा मोदी यांचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून स्पष्ट झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत