मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर तीव्र निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधींनी असा इशारा दिला की, भाजपच्या नेत्यांची झोप उडवणारा ‘हायड्रोजन बॉम्ब’ ते लवकरच फोडणार आहेत. “भाजपच्या लोकांनी तयार राहावं, कारण आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलंय.
त्यांनी पुढं भाषणात महत्त्वाची टीका करताना म्हटल की, ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, त्याच शक्ती आज संविधान संपवण्याच्या तयारीत आहेत.राहुल गांधी पुढं म्हणाले, मतचोरीवर आम्ही घेतलेली पहिली पत्रकार परिषद हा तर केवळ ‘अॅटम बॉम्ब’ होता. पण, आता जेव्हा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला चेहरा लपवण्यासाठीही जागा मिळणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.